Marathi News

राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या मूळ भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे !!!

Shree Ram Samartha logo

स्पर्धेच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत उतरलेल्या तरुणाईला भविष्य अर्थात करियरचा नेमका अर्थ समजला आहे का? याबाबत काहीसं प्रश्नचिन्ह आहे. हा संभ्रम नाहीसा करण्यासाठी राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचं चरित्र नक्कीच मार्गदर्शक आहे. बालवयात निस्सीम रामरायाची भक्ती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजोपयोगी कामांसाठी देशाटन करणारे राष्ट्रसंत रामदास स्वामी आपल्याला लवकरच श्री राम समर्थ सिनेमात दिसणार आहेत. येत्या १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा सिनेमा विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि  दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असून हा सिनेमा भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ”श्री राम समर्थ” सिनेमाची मूळ संकल्पना ऍड.सौ  विजया माहेश्वरी यांची आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले” मनाचे श्लोक” याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी   दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या दैनंदिन   कठीण प्रसंगात  मार्गदर्शक ठरतो. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे आणि मार्गदर्शनाचे अनेक पैलू ”श्री राम समर्थ” सिनेमात उलगडणार आहेत.
लग्नातील ”सावधान” या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त  केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे  पुरस्कर्ते  होते हे देखील सिनेमात पाहण्यास  मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यात रामदास स्वामींची कशाप्रकारे साथ मिळाली हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे.
अभिनेता शंतनू मोघे, महेश कोकाटे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजया सुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहे. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे.
हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा  समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतात.  कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, संगीत महेश नाईक आणि संजय मराठे यांनी दिले आहे.
कर्मठ आणि बुद्धिजीवी असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे. रंजक तसेच उदबोधक आणि प्रेरणादायी सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याची उत्तम संधी येत्या १ नोव्हेंबर पासून  प्रेक्षकांना मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button